HomeUncategorizedफळगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा,अपघाताची शक्यता

फळगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा,अपघाताची शक्यता

फळगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा,अपघाताची शक्यता
( ग्राम पंचायत प्रशासनाचा ठराव घेवुन कारवाईची पोलिसांकडे मागणी)
महागाव:-
हिवरा(संगम) येथील मुख्य चौकात गावामधुन येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील फळगाडयांमुळे वाहतूककोंडी व नागरिकांना त्रास होत असल्याने मुख्य रस्त्यावरील फळांचे गाडे हटवून रस्ता अतिक्रमण मुक्त करून रहदारीस खुला करून द्यावा अशी मागणी ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने ठराव घेवुन महागाव पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महागाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या हिवरा (सं.) येथे छत्रपती शिवराय चौकात गावामध्ये प्रवेश करताना फळ विक्रेते, भाजीपाला ,पाणीपुरी विक्रेते यांनी आपल्या हातगाडयांनी अतिक्रमण करून पूर्ण रस्ता व्यापला असल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सदर हातगाड्यांनी अतिक्रमण केलेले असल्याने लागूनच असणाऱ्या नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्गाचा चा दर्शनी भाग पूर्णपणे झाकला आहे. त्यामुळे गावातुन येणाऱ्या वाहनांना या हातगाड्यामुळे महामार्ग दुतर्फा दिसत नसल्याने वाहनधारक सरळ सरळ गावातून हायवे वर येत आहेत यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले भविष्यात एखाद्या जीवघेण्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच शाळेतील विद्यार्थिनी,विद्यार्थी, आबालवृद्ध व महिलांना या गाड्‌यांमुळे मार्गक्रमण करीत असताना खूप त्रास होत आहे. नेहमी मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास खूप अडचण येत आहे. सदर हातगाडे मुख्य रस्त्यावरून हटविण्यासाठी व मुख्य रस्ता मोकळा करण्यासाठी दि.३०/०५/२०२५ रोजी गावातील नागरिकांनी ग्राम पंचायत कडे अर्जाद्वारे मागणी केली होती.त्याच अनुषंगाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेल्या ग्राम पंचायत प्रशासनाने दि.३०/०५/२०२५ च्या ग्रा.पं. मासिक सभे मध्ये हातगाडे हटविण्याबाबत ठराव सुद्धा पारित करून नागरिकांना होत असलेल्या त्रासाला व अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता लक्षात घेता गावातील मुख्य रस्त्यावरील सर्व गाडे हटविण्यात यावेत अशी मागणी महागाव पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी ग्राम पंचायतचे उपसरपंच शरद पाटील कदम, ग्रा. प.सदस्य राजु धोतरकर ,पोलीस पाटील प्रविण कदम उपस्थित होते.
हिवरा(संगम) येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्या जावून नागरिकांना होणारा त्रास थांबेल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

.

RELATED ARTICLES

Most Popular